आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार घेणारी रायगडमधील पहिली ग्रामपंचायत ठरली खंडाळे ग्रामपंचायत
रायगड जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत घेते ग्रामस्थांच्या आरोग्याची आजारी पडण्यापूर्वीच काळजी.
खंडाळे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; योगा क्लासेस व आरोग्य मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ
अलिबाग(प्रतिनिधी)
दि. ८ जून २०२६ : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे आणि आजार होण्यापूर्वीच त्यांचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संरक्षण व्हावे, या उद्देशाने अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार घेणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून खंडाळे ग्रामपंचायतीची ओळख निर्माण झाली आहे.खंडाळे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांसाठी नियमित योगा क्लासेस तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक ८ जून २०२६ रोजी खंडाळे ग्रामपंचायत सरपंच श्री. नाशिकेत कावजी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रफुल्ल पाटील,श्री. सुशील वेळे,ग्रामसेवक श्री.बाबू चव्हाण, माजी सरपंच श्री. संतोष कनगुटकर, ज्येष्ठ नागरिक बबन पाटील, धनाजी मुंडकर, अनिल घरत, वंदना ताई, कल्याणी पाटील, विजया सुर्वे, उपेक्षा मोरे,उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव चव्हाण , माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, श्रीजाई फ्युचर एलएलपीचे संचालक डॉ. नितीन गांधी, उज्ज्वल माणुसकी समन्वयक ममता म्हात्रे व उत्कर्षा गुरव, ग्रामपंचायत समन्वयक सविता ओव्हाळ,तसेच खंडाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना उज्ज्वला चंदनशिव यांनी ग्रामपंचायतीने आरोग्यविषयक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांसाठी व योगा साठी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले.गावातील प्रत्येक नागरिक निरोगी राहावा आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी, यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.मार्गदर्शन करताना डॉ. नितीन गांधी म्हणाले की, “आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, योगा आणि आरोग्यविषयक जागरूकता यावर भर देणे आवश्यक आहे. ‘उज्ज्वल माणुसकी’ उपक्रमांतर्गत भविष्यात रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अशाच प्रकारचे आरोग्य शिबिर आणि योगा वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामसेवकांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि आयोजकांचे आभार मानले.
खंडाळे ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, हा उपक्रम ग्रामीण आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने एक आदर्श पाऊल ठरत आहे.