रंग-अभिनय
मानवी मनाच्या गर्भातून
उमटतात नऊ रंगांच्या लहरी
जीवनाच्या रंगमंचावर
प्रत्येक श्वास म्हणजे अभिनय
कधी शृंगाराचा मदनबाण
मनावर वसंत सुखावून जातो
तर कधी हास्याची चांदणी
दुःखाच्या ढगांना दूर सारते
करुणा बनून अश्रू वाहतात
हृदय संवेदनशीलतेचे अंबर होते
रौद्राचा त्रिशूळ सरसावतो तेव्हा
शांततेचा पुरता थरकाप उडतो
वीराचा हुंकार कडे भेदतो
तेजस्वी रूप डोळ्यांत साठवतो
भयानकाची छाया दाटते जेव्हा
पावले भीतीचे कुंपण ओलांडतात
बीभत्साची घृणा मन विटवते
सत्याची कवच-कुंडले गळून पडतात
विस्मयाच जादू क्षितिजे उजळते
बुद्धी तिथे स्तिमित होऊन थबकते
शेवटी शांततेचा हिमालय उरतो
जिथे साऱ्या भावना विरून जातात
मनुष्य केवळ एक भाव-यात्री
जो नऊ मुखवटे बदलत राहतो
या जगण्याच्या महानाट्यात
अन् श्वासांच्या महाकाव्यात
अभिनय हाच खरा कणा
आणि नवरस हाच श्वास...
प्रा. राजश्री पाटील
सुरत