भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त
नवीदिल्ली
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.