मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात प्रवाशी बोट उलटली; स्पीड बोटीने दिली धडक; ३ जणांचा मृत्यू; ८० पैकी ७७ जणांना वाचवण्यात यश
मुंबई(प्रतिनिधी)
गेट वे ऑफ इंडियाजवळ एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघातावेळी या बोटीत ८० प्रवासी होते. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली.
या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्यांकडे जात होती. तेव्हा एका स्पीड बोटीने नीलकमल फेरीबोटला धडक दिली. या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर येत आहे. ज्यात प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने धडक दिली त्यानंतर प्रवासी बोट नीलकमल नावाची बोट उलटली. दरम्यान ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पीड बोटीने आधी नीलकमलला एक राऊड मारला आणि त्यानंतर थोडी लांब जाऊन पुन्हा परत येताना तिला थेट येऊन धडक दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
स्पीड बोटीने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हा त्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला. ही धडक इतकी जोरात होती की ज्यामुळे प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बोट उलटली असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत माहिती दिली. मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
