माझा मुलाचा संघर्षमय प्रवास:तरुण पिढीने बोध घ्यावा.....
जीवनाचा प्रवास सुरू असताना दोन मूल मोठे झाले छान मार्कने उत्तीर्ण झाले.मोठा मुलगा 12 वी पास होऊन पुण्यात समोरच्या शिक्षणासाठी गेला सगळ सुरळीत चालू असताना अचानक पुण्यातून फोन आला मुलाच्या हॉस्टेल मधून की तुमच्या मुलाला ऍडमिट केले. एकदम डोळ्यासमोर अंधार झाला अचानक सगळ अनपेक्षित होत. काय झालं सुचेना वॉर्डन ला सांगितल जो खर्च येईल तो द्या आम्ही लगेच निघतो.
पण आईवडील ते आईवडीलच कुणीही लक्ष दिले नाही .स्वतः चालत जाऊन ऍडमिट झालेला माझा मुलगा दिसल्या दिवशीपर्यंत दोन्ही हात,दोन्ही पायांनी अपंग झाला पण त्याची ट्रिटमेंट झाली नाही .कुणी त्याला जेवण सुद्धा चारून दिले नाही .
आम्ही गेल्याबरोबर मुलाची अवस्था बघून पायाखालची जमीन सरकली.
तो म्हणाला आई कालपासून मी जेवलो नाही .डोळ्यात पाण्याचा सागर उभा राहिला.
तो लास्ट स्टेज वर पोहचला आम्ही पैसे भरले तेव्हा त्याची ट्रिटमेंट चालू झाली .रोज एक लाख रुपये खर्च घेत होते पुण्यात सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल होता.
तिथे बारा दिवस ठेवल्यानंतर डॉक्टर म्हणाले इथे ठेवत असल तर ठेवा नाहीतर घेऊन जा ,इतका पैसा आणायचा कुठून मग त्याला आम्ही गावी घेऊन आलो .
पण हातापाया नी लुळा झालेल्या माझ्या मुलाचा संघर्ष सुरू झाला.
मला योगाचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान असल्यामुळे मी त्याला आयुर्वेदिक औषधी आणि काढा देणे चालू केले
नागपूर मध्ये पाकमोडे डॉक्टर कडे नेले तेव्हा त्यांनी त्याच्या समोर सांगितले हा तीन महिन्यात उभा राहिला नाही तर कधीच चालू शकणार नाही.
माझा 17 वर्षांचा मुलगा खूप रडला दोन्ही हात दोन्ही पायांनी हतबल झालेला .
पण मी आणि माझ्या मिस्टर नी हिंमत न हरता त्याला घरीच मी तेल तयार करून मालिश करून देणे,त्याच्याकडून मी योगा आणि व्यायाम करून घेत होती,त्याला काढा देणे चालू केले हळूहळू कोणताही दवाखाना न करता योगा आणि आयुर्वेद च्या मदतीने मुलगा बर होऊ लागला. मुलाने पण हिंमत न हरता प्रत्येक गोष्टी सकारात्मक घेतल्या आणि हात आणि पायात सुधारणा होत गेली कॉलेज जॉईन केले काडी घेऊन चालायचा पण *युनिव्हर्सिटी टॉपर आला.MCA मध्ये 99.61% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाला* .
*आज तो पूर्ण बरा झाला आणि जॉब करतो तो सिस्टम इंजिनियर आहे* .
असा हा माझ्या मुलाच्या जीवनाचा संघर्ष ह्या कथेतून थोडक्यात मांडला
ही माझ्या जीवनाची सत्यकथा आहे.
सौ.वैजयंती विकास गहूकर
(जिल्हा चंद्रपूर)