Home

भरधाव बोलेरो खोल विहिरीत कोसळली; ४ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत


भरधाव बोलेरो खोल विहिरीत कोसळली; ४ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

अहिल्यानगर(वार्ताहर)

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो कार अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कारचे नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत पडल्याने मोठा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थली धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह स्थानिकांच्या मदताने कविहिरीत पडलेल्या मृतांना बाहेर काढले. क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील जामवाडी जामखेड रस्त्यावर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. हे चौघे जण बोलेरो वाहनाने जात होते. रस्त्याचे काम चालू असल्याने खडी पसरलेली होती. खडीवरून भरधाव वेगाने जाताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांनी परिसरातील लोकांना जमा केले. जामवाडी गावातील लोक तातडीने मदतीला धावून आले. कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही तरुण पाण्यात उतरले. 

त्यांनी चारही तरुणांना विहिरीतून बाहेर काढलं. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. क्रेनच्या मदतीने बोलेरो कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. या तरुणांना तातडीने समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकनं दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या चारही तरुणाचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विहीर ५० फूट खोल होती व पाण्याने भरली होती. मृत चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून कामाला होता. चारपैकी दोघांची लग्न झाले होते. त्यांना लहान लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात चारही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Previous Post Next Post