रेवदंड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; समता, न्याय आणि शिक्षणाचा विचार जागवला
रेवदंडा, (ओमकार नागावकर) :
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथील पंचशील युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “ज्ञान हेच माणसाचे खरे शस्त्र आहे” आणि “संविधान हे केवळ कागदावरचे लिखाण नसून ते सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे” या बाबासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ असल्याचे सांगत, सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज प्रगती करू शकतो, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल मोरे, सदस्य संतोष मोरे, माजी सदस्य सुरेश खोत, सदस्य संदीप खोत, निलेश खोत, सुराराम माळी, खलील तांडेल, अशोक नाईक, सुहास घोणे, इक्बाल फटाकरे, आसिफ गोंडेकर, हर्षल घरत, शरद वरसोलकर, सरोज वरसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचशील युवक मंडळाचे अध्यक्ष मधुकर गायकवाड, उपाध्यक्ष नितीन गायकवाड तसेच सदस्य सचिन पवार, सागर गायकवाड, गौरव गायकवाड, सतीश पवार, अमोल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजात समानता, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग अवलंबण्याचा संदेश देण्यात आला.