Home

रत्नागिरीमध्ये १६ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्वांना वाचवण्यात यश



रत्नागिरीमध्ये १६ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्वांना वाचवण्यात यश

रत्नागिरी(वार्ताहर)

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील रनपार किनाऱ्याजवळ समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १६ जणांची बोट अचानक उलटल्याची घटना मंगळवारी घडली. बोटीत अचानक बिघाड झाल्याने आणि समुद्र खवळलेला असताना या बोटीने नियंत्रण गमावले आणि पलटी झाली. काही क्षणांतच बोटीतले सर्व जण पाण्यात बुडू लागले. मात्र पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

सुदैवाने या घटनेच्या वेळीच रत्नागिरी पोलीस दलाने ‘सागर कवच’ या किनारपट्टी सुरक्षा अभियानाची तयारी सुरू केली होती. याच मोहिमेदरम्यान पोलीस पथक समुद्रकिनारी उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ परिस्थिती ओळखून मदतकार्यास सुरुवात केली. बोटीखालून वाचलेले सर्वजण पाण्यात जीव वाचवण्यासाठी झुंजत असताना, पोलीस पथकाने कोणतीही वेळ न दवडता मदतीचे हात पुढे केले.

रत्नागिरी पोलीसांनी धाडस, जलद निर्णय आणि तांत्रिक कौशल्य दाखवत बुडणाऱ्या सर्व १६ जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि सर्वजण सुखरूप असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाच्या त्वरित प्रतिसादाचे आणि शौर्याचे कौतुक केले आहे. तर यापुढे अशा मौजमजेसाठी समुद्रात जाणाऱ्यांनी हवामान, सुरक्षेच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Previous Post Next Post