तिलक वर्मा- हार्दिक पंड्याची तुफानी खेळी व्यर्थ; आरसीबीचा मुंबईवर रोमहर्षक विजय
मुंबई(वार्ताहर)
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी तुफानी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणले होते. पण मुंबईच्या संघावर विजय रुसल्याचेच पाहायला मिळाले. कारण या दोघांनी मोक्याच्या क्षणी आपल्या विकेट्स गमावल्या आणि त्यामुळेच मुंबईचा संघ पराभूत झाला. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने २२१ धावांचा डोंगर उभारला होता. पण मुंबईला हे आव्हान पेलवले नाही आणि आरसीबीने त्यांचा १२ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
२२२ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या रोहितने आक्रमक सुरुवात केली, पण तो १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांची काही काळ जोडी जमली होती. पण विल जॅक्ल २२ धावांवर आऊट झाला. त्यानंतर सूर्या २८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर मैदानात वादळ आले हे हार्दिक पंड्याच्या नावाचे. हार्दिकने तुफानी फटकेबाजी करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. तिलकने यावेळी २९ चेंडूंत ५६ धावा केल्या तर हार्दिकने १५ चेंडूंत ४२ धावांची खेळी साकारली, पण तरीही मुंबईला विजय मिळवता आला नाही.
विराट कोहलीने यावेळी मुंबईच्या गोलंदाजीला आपल्या तालावर चांगलेच नाचवले. विराट कोहलीने सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहचे स्वागत तर विराट कोहलीने त्याच्या पहिल्या षटकात षटकार लगावून केले. त्यावेळीच विराटने यावेळी आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट चांगल्या लयीत दिसत होता. त्यामुळे आता तो शतक झळकावेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्याचवेळी हार्दिक पंड्याने नमन धीरकरवी विराटला झेलबाद केले आणि विराटच्या शतकाचे स्वप्न अधुरेच राहीले. विराटने यावेळी ४२ चेंडूंत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारली. विराट बाद झाला तरी त्यानंतर रजत पाटीदारने मुंबईची पाठ काही सोडली नाही