शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर; पोटच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा अंत; समुद्रानं केलं गिळंकृत
रायगड(वार्ताहर)
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज शनिवारी सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणांची नावे मयुरेश पाटील (वय २३), हिमांशू पाटील (वय २१) आणि अवधूत पाटील (वय २६) असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांवर आज काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. आपल्या बहिणीचा मुलगा नुकताच ऐरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता. त्याला घेऊन संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव हे श्रीवर्धन तालुक्यातल्या वेळास बीचवर फिरण्यासाठी गेले होते. मात्र फिरण्यासाठी गेले असता या तिघांना पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर हे तिघेही खोल समुद्रात उतरले. मात्र समुद्रातल्या लाटांनी या तिघांना कधी गिळंकृत केलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील कुटुंबांनी नवीन गाडी घेतली होती. नवीन गाडी आणण्यासाठी संपुर्ण कुटुंब आनंदाने शोरुममध्ये पोहोचलं होतं. मात्र, आज तो आनंद दुःखात बदलला आहे. पाटील यांच्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील घरी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसोबत त्यांची दोन मुले एकाच वेळेस बीचवर फिरण्यासाठी गेली होती, त्यावेली तिथं घात झाला. मृतांमध्ये मयुरेश संतोष पाटील (वय 23 वर्षे), अवधुत संतोष पाटील (वय 26 वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर हिमान्शु पाटील (वय 21 वर्षे) याचा देखील या अपघातात मृत्यू झाला. हिमान्शु नवी मुंबई मधील ऐरोलीमध्ये राहत होता. या तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक बोट चालकांनी मदत केली.