रेवदंडा -अलिबाग मार्गावर 2 एस टी बसची धडक; चालकासह सुमारे 35 प्रवासी जखमी
अलिबाग (विशेष प्रतिनिधी)
रेवदंडा अलिबाग मार्गावरील अलिबाग शहरापासून सुमारे पाच किमी अंतरावर नवेदर बेली ते आक्षी गावांदरम्यानच्या वळणावर रविवारी (7 जुलै) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोनही एसटी बसमधील सुमारे 30 ते 35 प्रवाशांसह दोनही बसेसचे चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. जखमींवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. यातील काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.रविवारी सकाळी अलिबाग आगाराची अलिबाग - रेवदंडा ही एसटी बस (बस क्र एम एच 20 बीएल 3219) अलिबागकडून चालक नागनाथ रामचंद्र धुरे व वाहक सतीश पांडुरंग सूर्यवंशी हे प्रवासी घेऊन रेवदंडाकडे निघाले होते. तर मुरुड आगाराची मुरुड- भांडुप ही एसटी बस 37 प्रवाशांना घेऊन चालक अलीमभाई सय्यद अलिबागमार्गे भांडुपकडे निघाले होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोनही बस अलिबागपासून सुमार चार ते पाच किमी अंतरावरील नवेदर बेली ते आक्षी गावादरम्यानच्या वळणावर आल्या असता, दोन बसेसी समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन बसेसची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली.या अपघातामुळे बसमधील काही प्रवासी गंभीर तर काहींनी किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या. अलिबाग रेवदंडा बसवरील चालक व वाहक तसेच मुरुड-भांडुप बसवरील चालक हे गंभीर जखमी झाले. तर वाहक किरकोळ जखमी झाला. मुरुड - भांडुप एसटी बसमध्ये सुमारे 37 प्रवासी होते. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. जिल्हा रुग्णालयात सकाळी अकरा वाजेपर्यंत 30 जखमींची नोंद झाली होती. किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार करून सोडण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली होती, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.दरम्यान या अपघातात 18 प्रवासी जखमी असल्याची माहिती एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून देण्यात आली. तर जिल्हा रुग्णालयात या अपघातातील जखमी 31 प्रवाशांना दाखल केले होते. त्यातीत किरकोळ जखमी 9 प्रवाशांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया अलिबाग पोलिसांकडून सुरू होती.
कसा काय झाला अपघात?
अलिबागपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावरील नवेदर बेली ते आक्षी गावादरम्यान वळणाचा रस्ता असून रस्त्याच्या बाजूला झाडी वाढली आहे. रविवारी सकाळी असलेले पावसाळी वातावरण आणि वाढलेल्या झाडीमुळे वळणावरील पुढील रस्ता न दिसणे यामुळे चालकांना अंदाज न आल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
