वर्षासहलीसाठी आलेल्या दोन मुलांचा मूनवली तलावात बुडून मृत्यू
आ अलिबाग (विशेष प्रतिनिधी)
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात रविवार दि.२३ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन मुलांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मूनवली पंचक्रोशीतील आठ मुलांचा ग्रुप मूनवली येथे वर्षासहलीसाठी आला होता, त्यातील अथर्व शंकर हाके वय अंदाजे १६ वर्षे व शुभम विजय बाला वय अंदाजे १५ वर्षे हे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
बुडालेल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते, यावेळी परिसरातील काही मुलांनी प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेऊन मुलांना शोधण्यात मेहनत घेतली असता त्यांना साधारण दोन तासांनी यश मिळाले. यामध्ये अथर्व शंकर हाके रा. मूनवली याला प्रथम शोधून बाहेर काढले, तर शुभम विजय बाला रा. तुडाळ याला सुमारे अर्ध्या तासाने बाहेर काढण्यात यश मिळाले. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी हजर होते. अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत. घटना घडल्यानंतर घटनास्थळी पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र ह्या घटनेने मूनवली येथील हाके व तुडाळ येथील बाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

