Home

विराट कोहलीचे स्वप्न साकार; राँयल चँलेंजर्स बंगळुरू संघ ठरला आयपीएलचा चॅम्पियन; 18 वर्षांनी ट्रॉफीवर कोरले नाव; पंजाबचे स्वप्न भंगले


विराट कोहलीचे स्वप्न साकार; राँयल चँलेंजर्स बंगळुरू संघ ठरला आयपीएलचा चॅम्पियन; 18 वर्षांनी ट्रॉफीवर कोरले नाव; पंजाबचे स्वप्न भंगले 

अहमदाबाद

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी आरसीबीने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं. 

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट 16 धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने 43 धावा केल्या, मयंक अग्रवालने 17 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि एक षटकार होता. आरसीबीच्या १९१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवात चांगली केली होती. त्यांना ४३ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर त्यांचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि पंजाबच्या हातून सामना निसटतो की काय, असे वाटायला लागले. 

गेल्या सामन्यात पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेला श्रेयस अय्यर या सामन्यात पुरता अपयशी ठरला. कारण यावेळी त्याला फक्त एकच धाव करता आली. विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग-बोलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली. 

Previous Post Next Post