चौथीही मुलगीच झाली म्हणून विहिरीत टाकून संपवले; जन्मदात्यांचे क्रुर कृत्य
जालना(वार्ताहर)
दोन्ही डोळे एकसमान, मुलाएवढीच मुलगी महान.. असं आपण म्हणतो पण आजही वंशाला दिवा पाहिजेच असा अनेकजण हट्ट करत असतात. मुलगी नको म्हणून भ्रूणहत्या, सासरच्यांकडून विवाहितांचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशातच जालन्यामधून एक भयंकर घटना घडली असून आई वडिलांनीच एका महिन्याच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चौथी मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या माता पित्याने एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालन्याच्या आसरखेडा गावाच्या शिवारात ही घटना घडली. पाच दिवसांपूर्वी पोलिसांना विहिरीत एक महिन्याची मुलगी असलेलं बाळ मयत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार अज्ञात माता पित्या विरुद्ध गुन्हा करण्यात आला होता.
दुसरीकडे, अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून 50 ते 60 गावातील बाळाला जन्म देणाऱ्या एक हजार महिलांचा शोध घेतला असता जालना तालुक्यातील गारवाडी तांडा येथील एका महिलेने बाळाला जन्म दिला मात्र तिच्याकडे तिचं बाळ दिसत नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या पतीला ताब्यात घेतले असता चौथी मुलगीच झाल्याने त्यांनी हत्या करून बाळ विहिरीत फेकल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पती पत्नीविरुद्ध एका महिन्याच्या बाळाची हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. चंदणझिरा पोलिस करत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून जन्मदात्यांनीच असा क्रुरपणा केल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.