कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई
गेल्या दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 25 जून रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
कोकण विभागातील मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 25 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्यानं या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या चारही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठवाड्यातही 25 जून रोजी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ, वर्धा, अमरावती या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वादळी पाऊस सुरू असताना बाहेर पडणे टाळावे. बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. विजांचा कडकडाट होत असल्यास झाडाखाली थांबणे टाळावे, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.